बुधवार, ४ जानेवारी, २०१७

मानवाची अवस्था

HANUMNT KHADE:
🌺।। ते हे माय ज्ञानेश्वरी ।।🌺

जैसी ते शुकाचेनि आंगभारें ।
नळिका भोविन्नली एरी मोहरें ।
तेणें उडावें परी न पुरे ।
मनशंका ॥ ७६ ॥

वायांचि मान पिळी ।
अटुवें हियें आंवळी ।
टिटांतु नळी ।
धरुनि ठाके ॥ ७७ ॥

म्हणे बांधला मी फुडा ।
ऐसिया भावनेचिया पडे खोडां ।
कीं मोकळिया पायांचा चवडा ।
गोंवी अधिकें ॥ ७८ ॥

ऐसा काजेंवीण आतुंडला ।
तो सांग पां काय आणिकें बांधला ।
मग नोसंडी जऱ्ही नेला ।
तोडुनि अर्धा ॥ ७९ ॥

म्हणऊनि आपणयां आपणचि रिपु ।
जेणें वाढविला हा संकल्पु ।
येर स्वंयबुध्दी म्हणे बापु ।
जो नाथिलें नेघे ॥ ८० ॥

🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅
     पोपटाला
धरण्याकरीता टांगलेली झाडावरील नळी त्याच्या अंगभाराने उलट फिरली असतो,
तो उडुन न जातां आपणच आपणच फिरलो अशी मनांत शंका येऊन ती जशी सोडीत नाही,
तो व्यर्थ मान हालवतो, आणि छातीने व चवड्याने ती नळी आवळून चोचीनें धरून ओरडतो,
मी खरोखर बांधला गेलो अशा समजुतीने खोड्यांत पडतो, आणि मोकळ्या पायाचे चवड्याने नळी बळकट घरितो, असा जो निरर्थक सांपडला,
त्याला कोणी दुसरे बांधावयास आले होते का सांग बरे ?
आणि नंतर त्याला अर्धा तोडून नेला तरी तो ती नळी
सोडीत नाही ; म्हणून,
ज्याने मनांतील संकल्प जास्ती वाढविले आहेत,
तो आपला आपणच शत्रु होय.
पण जो पुरुष वृथाभिमान धारण करीत नाही,
तो आत्मज्ञानी होय.
 
🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅

        ज्ञानेश्वरी अध्याय ६

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा